Creative Commons License
This work is licensed under a Creative Commons Attribution 4.0 International License. .: गजानन विजय ग्रंथ : अध्याय १

गजानन विजय ग्रंथ : अध्याय १



श्रीगणेशाय नमः जयजयाजी उदारकीर्ती जयजयाजी प्रतापज्योती जयजयाजी हे गणपती ! गौरीपुत्रा मयूरेश्वरा ! ॥१॥ कार्यारंभीं तुझें स्मरण करित आले जन मोठमोठाले विद्वान साधुसंत सत्पुरुष ॥२॥ तुझ्या कृपेची अगाध शक्ति विघ्नें अवघीं भस्म होतीं कापुसाचा पाड किती अग्नीपुढें दयाघना ! ॥३॥ म्हणून आदरें वंदना करीतसे मी तुझ्या चरणां सुरस करवी पद्मरचना दासगणूच्या मुखानें ॥४॥ मी अज्ञान मंदमती नाहीं काव्यव्युत्पत्ति परी तूं वास केल्या चित्तीं कार्य माझें होईल हें ॥५॥ आतां आदि माया सरस्वती जी ब्रह्माची होय प्रकृती जी कविवरांची ध्येयमूर्ती ब्रह्मकुमारी शारदा ॥६॥ त्या जगदंबेकारण असो माझें साष्टांग नमन मी लेंकरुं आहें अजाण अभिमान माझा धरावा ॥७॥ तुझ्या कृपेची अगाध थोरी पांगळाही चढे गिरी मुका सभेमाझारीं देई व्याख्यान अस्खलित ॥८॥ त्या तुझ्या कीर्तीला कमीपणा आणी भला साह्य दासगणूला ग्रंथरचनेस करी या ॥९॥ आतां हे पुराणपुरुषा पांडुरंगा पंढरीशा सच्चिदानंदा रमेशा "पाहि माम्" दिनबंधो ॥१०॥ तूं सर्वसाक्षी जगदाधार तूं व्यापक चराचर कर्ता करविता सर्वेश्वर अवघे कांहीं तूंच तूं ॥११॥ जग, जन आणि जनार्दन तूंच एक परिपूर्ण सगुण आणि निर्गुण तूंच कीं रे मायबापा ॥१२॥ ऐसा तुझा अगाध महिमा जो कळे निगमागमा तेथें काय पुरुषोत्तमा या गणूचा पाड असे ॥१३॥ रामकृपा जेव्हां झाली तेव्हां माकडां शक्ति आली गोप तेही बनले बली यमुनातीरीं गोकुळांत ॥१४॥ तुझी कृपा व्हाया जाण नाहीं धनाचें प्रयोजन चरणीं होतां अनन्य तूं त्यातें साह्य करिशी ॥१५॥ ऐसा संतांनीं डांगोरा तुझा पिटला रमावरा म्हणून आलों तुझ्या द्वारां आतां विन्मुख लावूं नको ॥१६॥ हें संतचरित्र रचावया साह्य करी पंढरीराया माझ्या चित्तीं बसोनिया ग्रंथ कळसा नेई हा ॥१७॥ हे भवभवान्तक भवानीवरा हे नीलकंठा गंगाधरा ओंकाररुपा त्र्यंबकेश्वरा वरदपाणी ठेवा शिरीं ॥१८॥ तुझें साह्य असल्यावर काळाचाही नाहीं दर लोखंडासी भांगार परीस करुन ठेवीतसे ॥१९॥ तुझी कृपा हाच परीस लोखंड मी गणूदास साह्य करी लेंकरास परतें मजला लोटूं नको ॥२०॥ तुला अशक्य कांहीं नाहीं अवघेंच आहे तुझ्या ठाईं लेंकरासाठीं धांव घेई ग्रंथ सुगम वदवावया ॥२१॥ माझ्या कुळीची कुलदेवता कोल्हापुरवासिनी जगन्माता तिच्या पदीं ठेवितों माथा मंगल व्हाया कारणें ॥२२॥ हे दुर्गे तुळजे भवानी हे अपर्णे अंबे मृडानी ठेवी तुझा वरदपाणी दासगणूच्या शिरावर ॥२३॥ आतां वंदन दत्तात्रया पाव वेगीं मसीं सदया गजाननचरित्र गाया प्रसादासह स्फूर्ति दे ॥२४॥ आतां शांडिल्यादि ऋषीश्वर वसिष्ठ गौतम पाराशर ज्ञाननभीं जो दिनकर त्या शंकराचार्या नमन असो ॥२५॥ आतां अवघ्या संतमहंता नमन माझें सर्वथा दासगणूच्या धरुन हाता ग्रंथ करवा लेखन ॥२६॥ गहिनी निवृत्ति ज्ञानेश्वर श्रीतुकाराम देहूकर हे भवाब्धीचें तारुं थोर त्या श्रीरामदासा नमन असो ॥२७॥ हे शिर्डिकर सांई समर्था वामनशास्त्री पुण्यवंता दासगणूसी अभय आतां तुमचें असो द्या संत हो ॥२८॥ तुम्हां अवघ्यांच्या कृपेनें मी हें करीन बोलणें दासगणू मी तुमचें तान्हें कठोर मजविषयीं होऊं नका ॥२९॥ जी कां खरी माया असते तीच बोलाया शिकविते तुमचें माझें असें नातें मायलेंकापरी हो ॥३०॥ लेखणी काढी अक्षर परी तो तिच्यांत नाहीं जोर ती निमित्तकारण साचार लेखनरुपी कार्याला ॥३१॥ दासगणू लेखणी येथ तुम्ही धारण करा ती अवघे संत ग्रंथरचना रसभरित हीच आहे प्रार्थना ॥३२॥ आतां श्रोते सावधान संतकथेचें करा श्रवण करोनिया एकाग्र मन निजकल्याण व्हावया ॥३३॥ संत हेच भूमिवर चालते बोलते परमेश्वर वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे ॥३४॥ संत हेच सन्नीतीची मूर्ति होय प्रत्यक्ष साची संत भव्य कल्याणाची पेठ आहे विबुध हो ॥३५॥ त्या संतचरित्रास श्रवण करा सावकाश आजवरी ना कवणास संतांनीं या दगा दिला ॥३६॥ ईश्वरी तत्त्वांचे वाटाडे संत हेची रोकडे हे अमोघ ज्ञानाचे ते गाडे भरले असती प्रत्यक्ष ॥३७॥ संतचरणीं ज्याचा हेत त्याचा ऋणी रुक्मिणीकांत आतां मलरहित करा चित्त गजाननचरित्र ऐकावया ॥३८॥ भरतखंडामाझारीं संत झाले बहुतापरी ही पर्वणी आली खरी अवांतर देशाकारणें ॥३९॥ जंबुद्वीप हें धन्य धन्य आहे पहिल्यापासोन कोणत्या सुखाची ही वाण येथें पडली आजवरी ॥४०॥ याचें हेंच कारण या भूमीस संतचरण अनादि कालापासोन लागत आले आहेत कीं ॥४१॥ नारद, ध्रुव, कयाधूकुमर उद्धव, सुदामा, सुभद्रावर महाबली अंजनीकुमर अजातशत्रू धर्मराजा ॥४२॥ शंकराचार्य जगद्गुरु जे पदनताचे कल्पतरु जे अध्यात्मविद्येचे मेरु याच देशीं झाले हो ॥४३॥ मध्व-वल्लभ-रामानुज याचा ऋणी अधोक्षज ज्यानें धर्माची राखिली लाज निज सामर्थ्य दावोनिया ॥४४॥ नरसीमेहता तुलसीदास कबीर कमाल सुरदास गौरंग-प्रभूच्या लीलेस वर्णन करावें कोठवरी ? ॥४५॥ राजकन्या मिराबाई तिच्या भक्तीस पार नाहीं जिच्यासाठीं शेषशायी प्राशिता झाला विषातें ॥४६॥ गोरख-मच्छेंद्र जालंदर जे का योगयोगेश्वर ज्यांचा नवनाथ भक्तिसार ग्रंथ असे लीलेचा ॥४७॥ ज्यांनीं नुसतीच हरिभक्ति करुन साधिला श्रीपती ते नामा नरहरी सन्मति जनी कान्हो संतसखू ॥४८॥ चोखा-सावता-कूर्मदास दामाजीपंत पुण्यपुरुष ज्यांच्या कारणें वेदरास गेला महार होऊन हरी ॥४९॥ मुकुंदराज जनार्दन बोधला निपट निरंजन ज्यांचीं चरित्रें-गायन केलीं मागें महिपतींनीं ॥५०॥ म्हणून त्यांचीं नांवें येथ मी साकल्यें आतां देत नुसते सांगतों वाचा ग्रंथ भक्तिविजय भक्तमाला ॥५१॥ त्यानंतर जे जे झाले त्या त्या संतां मी गाइले ग्रंथ असती तीन केले ते पहा म्हणजे कळेल कीं ॥५२॥ त्या संतांच्या तोडीचा संत श्रीगजानन साचा या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर ॥५३॥ मीं जीं मागें गाईलीं संतचरित्रें असतीं भलीं तीं सारांशरुपें सांगितलीं त्रय ग्रंथातून विबुध हो ॥५४॥ आतां हें सांगोपांग चरित्र कथितों ऐका चांग मम सुदैवें आला योग हें चरित्र रचण्याचा ॥५५॥ जो प्रथमतांच मी पाहिला आकोटासन्निध संत भला तोच मागें राहिला त्याचें ऐका कारण ॥५६॥ माळा आधीं ओविती मग मेरुमणी जोडिती तीच आजी झाली स्थिति ह्या चरित्र रचण्याची ॥५७॥ शेगांव नामें वर्हाडांत ग्राम आहे प्रख्यात खामगांव नामें तालुक्यांत व्यापार चाले जेथ मोठा ॥५८॥ ग्राम लहान साचार परि वैभव त्याचें महाथोर ज्याचें नांव अजरामर झालें साधूमुळें जगत्रयीं ॥५९॥ त्या शेगांव सरोवरीं भलें गजानन कमल उदया आलें जें सौरभें वेधितें झालें या अखिल ब्रह्मांडा ॥६०॥ हा शेगांव खाणीचा हिरा गजानन होय साचा प्रभाव त्या अवलियाचा अल्पमतीनें वाणितों मी ॥६१॥ तें आतां अवधारा गजाननचरणीं प्रेम धरा येणें तुमचा उद्धार खरा होईल हें विसरुं नका ॥६२॥ गजाननचरित्र मेघ थोर तुम्ही श्रोते अवघे मोर चरित्ररुपीं वर्षतां नीर नाचाल वाटे निःसंशय ॥६३॥ शेगांवचे पौरवासी परम भाग्याचे निश्चयेंसी म्हणून लाधले तयांसी गजानन हें संतरत्न ॥६४॥ जेव्हां करावें लागे पुण्य तेव्हांच लाभती संतचरण संतश्रेष्ठ देवाहून येविषयीं शंका नसे ॥६५॥ रामचंद्र पाटलांनीं केली माझी विनवणी पंढरी क्षेत्रीं येऊनी कार्तिकीच्या वारीला ॥६६॥ माझा मनीं हेत होता गावें गजानन-चरित्रा परी त्याची तत्त्वतां संगत नाहीं लागली ॥६७॥ त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठीं केली रामचंद्राची योजना या समर्थें ॥६८॥ खर्या संताचें धोरण कळे कोणालागोन महापुरुष गजानन आधुनिक संत चूडामणी ॥६९॥ या महापुरुषाचा ठावठिकाण कोणचा वा पत्ता त्यांच्या जातीचा इतिहासदृष्टया लागे कीं ॥७०॥ जेवीं ब्रह्माचा ठावठिकाण कळे कोणालागून ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याचा करणें असे ॥७१॥ जो कां हिरा तेजमान पूर्णपणें असे जाण तेज त्याचें पाहोन ज्ञाते तल्लीन होती कीं ॥७२॥ तेथ त्या हिर्याची खाण आहे कोणाचि हे विचारीं आणण्याची गरज मुळीं राहात नसे ॥७३॥ ऐन तारुण्याभीतरीं गजानन आले शेगांवनगरीं शके अठराशाभीतरीं माघ वद्य सप्तमीला ॥७४॥ कोणी कोणी म्हणती जन श्रीसमर्थांचें जें कां स्थान त्या सज्जनगडाहून या देशीं आले हे ॥७५॥ परियाला पुरावा सबळ ऐसा नाहीं बरवा परी कांहीं तरी असावा अर्थ त्याच्या म्हणण्यांत ॥७६॥ लोक अवघे भ्रष्ट झाले नाना यातनें गांजले त्यांच्यासाठीं वाटतें केलें कौतुक ऐसें समर्थांनीं ॥७७॥ जगाचा करण्या उद्धार गजाननरुपें अवतार धरुन आले महीवर पुन्हां समर्थ सिद्धयोगी ॥७८॥ कोणत्याही कलेवरी योगीपुरुष प्रवेश करी ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरुंनीं केला असे ॥७९॥ गोरख जन्मला उकिरड्यांत कानीफा गजकर्णांत चांगदेव नारायण डोहांत योनीवांचून प्रगटले ॥८०॥ तैसेंच येथें कांहींतरी झालें असावें निर्धारी गजाननासी अंगें सारीं होतीं योगाचीं अवगत ॥८१॥ हें त्यांच्या लीलेवरुन पुढें कळेल तुम्हां लागून योगाचें अगाध महिमान त्याची सरी ये कोणा ॥८२॥ शेगांवीं माघमासीं वद्य सप्तमी ज्या दिवशीं हा उदय पावला ज्ञानराशी पदनतातें तारावया ॥८३॥ त्या वेळची तुम्हां कथा सांगतों मी ऐका आतां एक भाविक गृहस्थ होता नाम ज्याचें देविदास ॥८४॥ हा देविदास सज्जन पातूरकरांचा वंशज जाण शाखा ज्यांची माध्यंदिन मठाधिपती होता तो ॥८५॥ त्याच्या एका मुलाची ऋतुशांति होती साची त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घरा ॥८६॥ उष्टया पत्रावळी रस्त्यावर टाकिल्या होत्या साचार घराचिया समोर त्या देविदास विप्राच्या ॥८७॥ तो गजानन समर्थसिद्धयोगी बसले होते तया जागीं एक बंडी होती अंगीं जुन्या पुराण्या कापडाची ॥८८॥ कोणत्याहि उपाधीचें नांव नव्हतें जवळीं साचें पात्र पाणी प्यावयाचें होता एक भोपळा ॥८९॥ कच्ची चिलीम हातांत जी होती तयांची स्वकृत कुंभाराच्या भट्टीप्रत जिनें नव्हतें पाहिलें ॥९०॥ नासाग्र दृष्टि मुद्रा शांत तपोबल अंगीं झळकत प्राचीच्या वालरवीवत् वर्णन किती करावें ॥९१॥ मूर्ति अवघी दिगंबर भाव मावळला आपपर आवडनिवड साचार राहिली जवळी जयाच्या ॥९२॥ ती समर्थांची स्वारी बैसोनिया रस्त्यावरी शोधन पत्रावळीचे करी केवळ निजलीलेनें ॥९३॥ शीत पडल्या दृष्टीप्रत तें मुखीं उचलुनी घालीत हें करण्याचा हाच हेत अन्नपरब्रह्मकळवावया ॥९४॥ कां कीं गर्जोन सांगे श्रुती अन्न हेंच ब्रह्म निगुती "अन्नम् ब्रह्मेति" ऐसी उक्ती उपनिषदांठायीं असे ॥९५॥ त्याची पटवावया खण शितें वेंचती दयाघन त्याचा सामान्य जनांलागून भावार्थ तो कळला नसे ॥९६॥ बंकटलाल आगरवाला होता रस्त्यानें चालला त्यानें हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेह्यासह ॥९७॥ दामोदरपंत कुलकर्णी त्यांच्या स्नेह्याचें नांव जाणी दोघे तो प्रकार पाहोनी आश्चर्यचकित जाहले ॥९८॥ आणि एकमेकांप्रत बोलूं लागले ऐसें सत्य कीं याची करणी विपरीत वेडयापरी दिसतसे ॥९९॥ हा अन्नार्थी जरी असतां तरी पात्र मागून घेता देवीदासही यातें देता कां कीं तोही सज्जन ॥१००॥ द्वारीं आलेला याचक लावी ना सुज्ञ परत देख कांहीं चाले तर्क कृतीवरुनी याच्या ह्या ॥१॥ बंकटलाल म्हणे पंतासी ऐसेच उभें रस्त्यासी आपण राहूं यत्कृतीसी अजमावयाकारणें ॥२॥ खरे साधु पिशापरी जगीं वागती वरवरी ऐसी व्यासाची वैखरी बोलली आहे भागवतांत ॥३॥ कृतीनें हा दिसे वेडा परी वाटे ज्ञानगाडा वा विमल ज्ञानाचा हुडा असावा कीं प्रत्यक्ष ॥४॥ ऐसा विचार परस्पर करुं लागले साचार रत्न असतां समोर पारखी तोच जाणे त्या ॥५॥ पंथें हजारों लोक गेले परी कोणी पाहिले या दोघांवांचून भले याचा विचार कर हो ! ॥६॥ हिरे गारा एक्या ठायीं मिसळल्या असती जगा ठायीं पारखी तो निवडून घेई गार टाकून हिर्यातें ॥७॥ प्रथमता तो पुढें झाला बंकटलाल आगरवाला गजाननासी विचारण्याला विनयानें येणें रीतीं ॥८॥ ह्या पत्रावळीच्या शोधना कां हो करितां कळेना क्षुधा असेल आपणां तरी तरतूद करुं अन्नाची ॥९॥ त्यानें ऐसें विचारिलें परि उत्तर मिळालें नुसतें वरी पाहिलें उभयतांच्या मुखाकडे ॥११०॥ तो सतेज कांती मनोहर दंड गर्दन पिळदार भव्य छाती दृष्टि स्थिर भृकुटी ठायीं झाली असे ॥११॥ निजानंदीं रंगलेला ऐसा योगी पाहिला मौनेंच नमस्कार केला चित्तीं संतोष पावोनिया ॥१२॥ देविदासबुवासी सांगूं लागले प्रेमेंसी तुम्ही पात्र वाढून वेगेंसी आणा एक बाहेर ॥१३॥ देविदासें तैसें केलें पक्वान्नांनीं भरलेलें पात्र आणून ठेविलें द्वारासमोर स्वामीपुढें ॥१४॥ ठेविलेल्या पात्रावरी भोजना बैसली समर्थस्वारी चवी कशाची अंतरीं अणुमात्र उरली असे ॥१५॥ अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला तो कां मागतो गुळवण्याला मिटक्या मारीत बैसेल ? ॥१६॥ जो सार्वभौम नृपवर झाला असे साचार अशा नरासी जहागीर मिळाल्यासी प्रेम नुपजे ॥१७॥ अवघीं पक्वान्नें एक केलीं आवडनिवड नाहीं उरली जठराग्नीची तृप्ति केली दोन प्रहरच्या समयाला ॥१८॥ बंकटलाल तें पाहून पंतासी करी भाषण ह्या वेडा म्हणालों आपण ती निःसंशय झाली चुकी ॥१९॥ सुभद्रेसाठीं द्वारकेला अर्जुन ऐसाच वेडा झाला व्यवहाराचा विसर पडला करुं लागला भलभलतें ॥१२०॥ तैसाच हा ज्ञानजेठी मुक्तिरुप सुभद्रेसाठीं वेडा झाला कसवटी याची आतां घेणें नको ॥२१॥ धन्य आपुलें शेगांव दृष्टी पाहिला योगीराव "निरिच्छा" हा जहागीरगांव दिला हरीनें जयाला ॥२२॥ सूर्य माध्यान्हीं आला भाग भूमीचा तप्त झाला पांखरें हीं आश्रयाला जाऊन बैसलीं वृक्षावरी ॥२३॥ ऐशा भर उन्हांत हा बैसला आनंदांत हा ब्रह्मची होय साक्षात् भय ना कशाचें उरलें या ॥२४॥ हा जेवळा यथेच्छपणीं तुंब्यामध्यें नाहीं पाणी तें पंता या लागुनी आपण देऊं आणून ॥२५॥ पुसूं लागले दामोदर तुंब्यामध्यें नाहीं नीर मर्जी असल्या हा चाकर पाणी द्याया तयार असे ॥२६॥ ऐसे शब्द ऐकिले समर्थांनीं हास्य केलें उभयतांसी पाहून वदले तें ऐका सांगतों ॥२७॥ तुम्हां गरज असेल जरी तरी आणून घाला वारी एक ब्रह्म जगदांतरीं ओतप्रोत भरलें असें ॥२८॥ तुम्ही आम्ही भेद तेथ नाहीं उरला यत्किंचित परी जगव्यवहार सत्य आचरिला पाहिजे ॥२९॥ अन्न भक्षिलें देहानीं म्हणून त्या पाहिजे पाणी हा व्यवहार चतुरांनीं अवश्य पाहिजे जाणिला ॥१३०॥ म्हणून तुमच्या चातुर्यासी गरज असल्या तुम्हां साची तरतूद करा पाण्याची म्हणजे अवघें संपलें ॥३१॥ हें भाषण ऐकतां दोघे हर्षले तत्त्वतां बंकटलाल म्हणे पंता आपुलें आहे भाग्य धन्य ॥३२॥ पाणी आणण्या दामोदर घरांत गेले साचार तों इकडे प्रकार काय घडला तो ऐका ॥३३॥ कूपाचिया शेजारीं हाळ होता निर्धारीं जेथें जनावरें सारीं पीत होतीं पाण्याला ॥३४॥ तेथें जाऊन पाणी प्याले तृप्ततेचे ढेकर दिले तों इतक्यांत घेऊन आले पंत पाणी गडव्यांत ॥३५॥ हां हां तें गढूळ पाणी समर्था लावा वदनीं तें जनावरालागुनी योग्य आहे प्यावया ॥३६॥ मीं हें पहा आणिलें नीर गोड निर्मळ थंडगार वासित केलें साचार वाळा घालून यामध्यें ॥३७॥ ऐसें भाषण ऐकतां महाराज वदले तत्त्वतां व्यावहारिक अवघ्या कथा ह्या सांगा आम्हां तुम्ही ॥३८॥ हें अवघें चरचर ब्रह्में व्याप्त साचार तेथें गढुळ,निर्मळ वासित नीर हे भेद राहिले ॥३९॥ पाणी तरी तोच आहे निर्मळ गढुळ तोच पाहे सुवास कुवास दोन्ही हें रुप त्याचें निःसंशय ॥१४०॥ पिणाराही वेगळा त्यापासून ना निराळा ईश्वराची अगाध लीला ती कळे या नरजन्मीं ॥४१॥ तें दिलें टाकून व्यवहारीं गोविलें मन यांचेंच करा सदा मनन कशापासून जग झालें ॥४२॥ ऐसी ऐकतां समर्थवाणी दोघे गेले गहिंवरोनी अनन्यभावें समर्थचरणीं लोळावया तयार झाले ॥४३॥ तो त्यांचा जाणोन हेत महाराज निघाले पळत पळत वायूच्या त्या गतिप्रत अडथळा जगीं कोण करी ? ॥४४॥ यापुढील कथा पाही निवेदन होईल द्वितीयाध्यायीं अवधान द्यावें लवलाही त्या श्रवण करावया ॥४५॥ हा गजाननविजय ग्रंथ आल्हादवो भाविकांप्रत हेंच विनवी जोडोन हात ईश्वरासी दासगणू ॥१४६॥ श्रीहरिहरार्पणमस्तु॥ शुभं भवतु इति प्रथमोऽध्यायः समाप्तः





No comments:

Post a Comment