Creative Commons License
This work is licensed under a Creative Commons Attribution 4.0 International License. .: गजानन विजय ग्रंथ : अध्याय 5

गजानन विजय ग्रंथ : अध्याय 5


अध्याय



श्रीगणेशाय नमः हे अज अजित अद्वया सच्चिदानंदा करुणालया दासगणू लागला पायां आतां अभय असूं दे ॥१॥ मी हीन दीन पातकी नर नाहीं कोणता अधिकार सर्व बाजूंनीं लाचार आहें मी देव देवा ॥२॥ परी अत्यंत हीनावरी थोर सर्वदा कृपा करी पाहा अंगीं लाविली खरी विभूति श्रीशंकरानें ॥३॥ तो हीनांचा हीनपणा थोरा आणि कमीपणा हें जाणोन नारायणा गणू हा ठेवा संग्रहीं ॥४॥ सर्व लाड लेंकराचे माता ती पुरवि साचे आहे दासगणूचें ओझें सर्व तुझ्या शिरीं ॥५॥ जैसें करशील तैसें करी परी दया असूं दे अंतरीं देवा तुझ्या बळावरी दासगणूच्या सार्या उडया ॥६॥ गजानन असतां शेगांवीं यात्रा येई नित्य नवी ती कोठवरी वर्णावी ? पार लागे तियेचा ॥७॥ महिमा तो वाढला फार म्हणून गजानन साधुवर ती उपाधी करण्या दूर भटकूं लागले काननीं ॥८॥ महिना महिना तिकडेच राहावें वाटेल तेथेंच बैसावें कोणाशीं उमगूं द्यावें चरित्र आपुलें येतुलेंही ॥९॥ श्रोते एका समयासी महाराज पिंपळगांवासी गेले तेथें गोष्ट कैसी झाली ते अवधारा ॥१०॥ त्या पिंपळगांवच्या शिवारांत होतें एक अरण्यांत शंकराचें मंदिर सत्य जुनें पुराणें हेमाडपंती ॥११॥ ऐशा त्या मंदिरीं येते झाले साक्षात्कारी बैसले शिवाच्या गाभारीं लावोनिया पद्मासन ॥१२॥ गुराखी त्या गांवचे आपापले कळप गुरांचे घेऊनिया निघाले साचे अस्तमानीं गांवाकडे ॥१३॥ मंदिरापुढें तत्त्वतां एक लहान ओढा होता तेथें पाणी पाजण्याकरितां गुरें गुराखी पातले ॥१४॥ कोणी सहज मंदिरांत गेले वंदण्या शिवाप्रत तों तेथें पाहोन समर्थ आश्चर्यचकित जाहले ॥१५॥ मुलें म्हणती या मंदिरीं कोणी पाहिला आजवरी पुरुष बसलेला निर्धारी अस्तमानाचे समयाला ॥१६॥ कांहीं गुराखी बाहेर आले इतरां बोलावूं लागले कांहीं तेथेंच बैसले सत्पुरुषाचे समोर ॥१७॥ परी साधु बोलेना डोळे मुळींच उघडीना याचें कारण कळेना त्या गुराखी अर्भकांसी ॥१८॥ कोणी म्हणती थकलेला हा साधु दिसतो भला शक्ति मुळीं नुरली त्याला बोलावयाकारणें ॥१९॥ कोणी म्हणती उपवासी असावा निश्चयेसी थोडी भाकर तयासी देऊं आपण खावया ॥२०॥ ऐसें म्हणून भाकर धरली मुखासमोर भाविक मुळचीं गुराखी पोरें हलवूं लागलीं समर्थाला ॥२१॥ परी साधु हालेना मुखीं शब्द बोलेना म्हणून सार्या गुराख्यांना नवल वाटलें विशेष ॥२२॥ गुराखी आपसांत बोलती याची मुळीं ना कळे स्थिती जरी मेला म्हणावा निश्चिती तरी आहे बसलेला ॥२३॥ अंग ना झालें थंडगार ऊन आहे साचार यावरुन हा जिवंत नर आहे आहे शंका नको ॥२४॥ कोणी म्हणे असेल भूत मायावी रुप दावित कोणी म्हणे हें तर सत्य शिवापुढें ना भूत येई ॥२५॥ कोणी म्हणती स्वर्गीचा देव हा असावा साचा लाभ त्याच्या दर्शनाचा झाला आपणां हेंच भाग्य ॥२६॥ याचें आतां पूजन करुं अवघे आपण जा स्नानालागून पाणी आणा ओढयाचें ॥२७॥ पोरें गेलीं ओढयावरी गेळ्यामध्यें आणिलें वारी परमभावें पायांवरी घालिते झाले समर्थांच्या ॥२८॥ कोणी वन्यपुष्पें आणिलीं माळ त्यांची तयार केली कंठामध्यें घातिली गुराख्यांनीं साधूच्या ॥२९॥ कोणी कांदाभाकर नैवेद्यार्थ साचार दिली ठेवून समोर एका वडाच्या पानावरी ॥३०॥ गुराख्यांनीं केलें नमन आदरें भाव धरुन कांहीं वेळ केलें भजन पुढें बसून समर्थांच्या ॥३१॥ ऐसा आनंद चालला तों गुराखी एक बोलला अरे वेळ बहु झाला। चला आतां गांवाकडे ॥३२॥ दिवस गेला मावळून कां आलीं रानांतून मुलें गुरांना घेऊन ऐसें लोक म्हणतील कीं ॥३३॥ कदाचित्आपणांसी पाहण्या येतील काननासी तान्ही वांसरें घरांसी लागलीं असतील हुंबरावया ॥३४॥ या साधूची हकीकत आपण सांगूं गांवांत शहाण्या वडील माणसांप्रत म्हणजे येईल कळून कीं ॥३५॥ तें अवघ्यांसी मानवलें गुराखी सर्व निघून गेले गांवामाजीं कळविलें मंदिराचें अवघे वृत्त ॥३६॥ पुढें श्रोते प्रातःकाळीं आली गांवची मंडळी समर्थांसी पाहाण्या भली गुराख्यांच्या बरोबर ॥३७॥ जैसा काल होता बसला तैसाच आतां पाहिला भाकरीसी ना स्पर्श केला ती जशीच्या तशीच आहे कीं ॥३८॥ म्हणूं लागले गांवकरी हा योगी पुरुष कोणी तरी आहे बैसला मंदिरीं सांप्रत या शंकराच्या ॥३९॥ कोणी ऐसें बोलले शिव पिंडीच्या बाहेर आले आपणां दर्शन द्याया भले चला नेऊं या गांवांत ॥४०॥ हा समाधी उतरील तेव्हां कांहीं बोलेल ती उतरण्या आहे वेळ त्याला त्रास देऊं नका ॥४१॥ बंगाल देशीं जालंदर बारा वर्षें झाले स्थिर समाधीच्या जोरावर गर्तेमाजीं ख्यात हें ॥४२॥ ऐसी भवति भवति झाली एक पालखी आणविली त्यांत उचलून ठेविली समर्थांची मूर्ति पाहा ॥४३॥ ग्रामांतील नारीनर अवघे होते बरोबर पुढें वाजंत्र्यांचा गजर होत होता विबुध हो ! ॥४४॥ मधून मधून तुळशीफुलें पौर टाकीत होते भले समर्थाचें अंग झालें गुलालानें लाली लाल ॥४५॥ घंटाघडयाळें वाजती लोक अवघे भजन करिती जय जय योगिराज मूर्ति ऐसें उंच स्वरानें ॥४६॥ मिरवणूक आली गांवांत मारुतीच्या मंदिरांत बसविले आणून सद्गुरुनाथ एका भव्य पाटावरी ॥४७॥ तोही दिवस तैसाच गेला मग लोकांनीं विचार केला आपण करुं स्तवनाला उपाशी बसून याच्यापुढें ॥४८॥ ऐसा जो तो विचार करिती तों आले देहावरती गजानन श्रीसद्गुरुमूर्ति मुगुटमणी योग्यांचे ॥४९॥ मग काय विचारतां आनंद झाला समस्तां प्रत्येक स्त्रीपुरुष ठेवी माथा स्वामीचिया चरणांवरी ॥५०॥ नैवेद्याची धूम झाली ज्यानें त्यानें आणिलीं पात्रें तीं वाढून भलीं मारुतीच्या मंदिरांत ॥५१॥ त्या अवघ्यांचा स्वीकार समर्थें केला थोडाफार हाळोपाळींत साचार ही वार्ता श्रुत झाली ॥५२॥ पुढें दुसर्या मंगळवारीं पिंपळगांवचे गांवकरी आले बाजारा निर्धारीं शेगांवाकारणें ॥५३॥ ते शेगांवच्या लोकांसी सहज बोलले प्रेमेसी आमच्याही गांवासी आला एक अवलिया ॥५४॥ अवलिया थोर अधिकारी प्रत्यक्ष आहे श्रीहरी धन्य पिंपळगांव नगरी पाय लागले साधूचे ॥५५॥ आम्ही तया योगीवरा कोठें जाऊं देऊं खरा निधि चालत आला घरा त्यातें कोण दवडी हो ? ॥५६॥ शेगांवचे बाजारांत जिकडे तिकडे हीच मात बंकटलाला झालें श्रुत वर्तमान तें अवलियाचें ॥५७॥ बंकटलाल पत्नीसहित गेला पिंपळगांवांत समर्थासी जोडोन हात विनवूं लागला नानापरी ॥५८॥ आतां येतो म्हणून निघून गेलात आपण त्यास झाले पंधरा दिन याचा विचार करा हो ॥५९॥ गुरुराया तुम्हांवीण भणभणीत दिसे सदन शेगांवचे अवघे जन चिंतातुर झाले हो ॥६०॥ गाडी आणिली आपणांसाठीं चला शेगांवीं ज्ञानजेठी मायलेका होणें तुटी हें कांहीं बरें नसे ॥६१॥ कित्येक दयाळा आपुले भक्त राहिले असती उपोषित त्या शेगांव शहरांत नित्य दर्शन घेणारे ॥६२॥ म्ही आल्या शेगांवीं मी ही तनु त्यागीन वरवी आमुची सांगा पुरवावी आळ कोणी गुरुवर्या ? ॥६३॥ बंकटलाल ऐसें वदले महाराज गाडीवरी बसले शेगांवासी निघाले पिंपळगांवा सोडून ॥६४॥ जैसा मागें गोकुळाला न्याया कृष्णा अक्रूर आला तैसा बंकटलाल भासला अक्रूर पिंपळगांवातें ॥६५॥ पिंपळगांवच्या लोकांप्रती बंकटलाल समजाविती नका होऊं दुःखित चित्तीं जाती कोठें लांब साधु ॥६६॥ वाटेल तेव्हां दर्शना यावें हेतु आपुले पुरवावे जेथल्या तेथें असूं द्यावें या अमोल मूर्तीला ॥६७॥ बहुतेक पिंपळगांवाचा बंकटलाल साहुकार साचा मनोभंग साहूचा करण्या कुळांची छाती नसे ॥६८॥ चुरमुर्याचे लाडू खात पिंपळगांव बसलें स्वस्थ महाराज बसून गाडींत जाऊं लागले शेगांवा ॥६९॥ पथीं जातां गुरुमूर्ति बोलली बंकटलालाप्रती ही का साहूची होय रीति माल दुसर्याचा बळें न्यावा ! ॥७०॥ मशी यावया तुझ्या घरीं भय वाटतें अंतरीं तुझ्या घरचि नाहीं बरी रीत हें मी पाहतों ॥७१॥ लक्ष्मी जी लोकमाता महाविष्णूची होय कांता जिची असे अगाध सत्ता तिलाही त्वां कोंडिलें ॥७२॥ तेथें माझा पाड कोण ? म्हणून गेलों पळोन जगदंबेचे पाहून हाल माझें चित्त भ्यालें ॥७३॥ ऐसें ऐकतां हंसूं आलें बंकटलालाप्रती भलें विनयानें भाषण केलें तें ऐका सावचित्तें ॥७४॥ बंकट बोले गुरुनाथा माझ्या कुलपा भ्याली माता आपुला वास तेथें होता म्हणून झाली स्थीर ती ॥७५॥ जेथें बाळ तेथें आई तेथें दुज्याचा पाड काई ? आपुल्या पायापुढें नाहीं मला धनाची किंमत ॥७६॥ तेंच माझें धन थोर म्हणून आलों इथवर माझें उरलें आतां घर तें सर्वस्वीं आपुलें ॥७७॥ घरमालकाकारण शिपाई आडवी कोठून ? जैसें तुमचें इच्छील मन तैसेंच तुम्ही वागावें ॥७८॥ इतकीच माझी विनंती शेगांवीं असो वस्ती धेनू काननातें जाती परी येती घरीं पुन्हां ॥७९॥ तसेंच तुम्हीं करावें अवघ्या जगां उद्धरावें परी आम्हां विसरावें शेगांवीं यावें वरचेवर ॥८०॥ ऐसी समजूत घालून शेगांवीं आणले गजानन तेथें कांहीं दिवस राहून निघून गेले पुनरपि ॥८१॥ ती ऐकावी तुम्ही कथा सांगतों मी इथें आतां। अडगांव नामें ग्राम होता एक तया वर्हाड प्रांतीं ॥८२॥ त्या ग्रामाकारण जाया निघाले दयाघन प्रातःकाळीं चुकवून नजर शेगांवकरांची ॥८३॥ महाराजांची चालगती वायुचिया समान होती अंजनी-तनय मारुती आला काय वाटे पुन्हां ॥८४॥ मास होता वैशाख सोळा कलांनीं तपे अर्क क्वचित्कोठें राहिलें उदक ऐसा प्रखर उन्हाळा ॥८५॥ माध्यान्हीच्या समयाला अकोली गांवापासी आला हा योगयोगेश्वर साधु भला गजानन महाराज ॥८६॥ तों काय घडलें वर्तमान समर्थांसी लागली तहान करिती चौफेर अवलोकन तों उदक कोठें दिसेना ॥८७॥ अंगावाटे चालल्या धारा घामाच्या त्या एकसरा अधरोष्ठ तो सुकला खरा उदकाविण समर्थांचा ॥८८॥ ऐशा दुपारच्या अवसरीं भास्कर नामें शेतकरी घालीत होता पाळी खरी आपुल्या त्या शेताला ॥८९॥ शेतकर्याची पाहतां स्थिति हें अवघ्यांत मुख्य असती कृषीवल हा निश्चिती अन्नदाता जगाचा ॥९०॥ अंगीं ऐसें मोठेंपण परी सोशी यातना दारुण बिचार्यांना ऊन ताहान सोसणें भाग असे कीं ॥९१॥ त्या अकोलीच्या शिवारांत जलाचें दुर्भिक्ष्य अत्यंत एक वेळा मिळेल घृत परि अभाव पाण्याचा ॥९२॥ आपणांतें प्यावयासी भास्करानें शेतासी आणिलें खापराच्या घागरीसी उदक होतें गांवांतून ॥९३॥ पाठीसी ती भाकर डोईं जलाची घागर ऐसा होता प्रकार शेतामाजीं येण्याचा ॥९४॥ ती घागर झुडुपाखालीं होती भास्करें ठेविली त्या ठिकाणीं स्वारी आली भास्करा जल मागावया ॥९५॥ समर्थ म्हणती भास्कराला तहान लागली मला पाणी दे बा प्यावयाला नाहीं ऐसें म्हणूं नको ॥९६॥ पुण्य पाणी पाजण्याचें आहे बापा थोर साचें पाण्यावांचून प्राणाचें रक्षण होणें अशक्य ॥९७॥ धनिक पाणपोया घालिती हमरस्त्याच्या पथावरती याचें कारण शोध चित्तीं म्हणजे येईल कळोन ॥९८॥ भास्कर बोले त्यावर तूं नंगा धूत दिगंबर तुला दांडग्या पाजितां नीर पुण्यलाभ कशाचा ? ॥९९॥ अनाथ-पंगू-दुबळ्यांसाठीं त्या पुण्याच्या शोभती गोष्टी वा जो समाजहितासाठीं झटे त्यासी साह्य करा ॥१००॥ ऐसें शास्त्राचें आहे वचन तुझ्यासारख्या मैंदाकारण आम्ही पाजितां जीवन तें उलटें पाप होय ॥१॥ भूतदयेच्या तत्त्वें भला सर्प कोणी कां पोसला ? वा जागा चोरटयाला देती सदनीं काय कोणी ? ॥२॥ तूं भीक मागून घरोघर केलेंस पुष्ट शरीर भारभूत साचार झालास आपुल्या कृतीनें ॥३॥ मीं माझ्यासाठीं घागर आणिली सकाळीं डोक्यावर त्या आयत्या पिठावर रेघोटया तूं ओढूं नको ॥४॥ तुला ना देणार पाणी नको करुं रे विनवणी जा जा करी येथोनी काळें आपलें चांडाळा ॥५॥ तुझ्यासारिखे निरुद्योगी जन्मले आमच्यांत जागजागीं म्हणून झालों अभागी आम्ही चहूं खंडांत ॥६॥ हें भास्कराचें भाषण समर्थांनीं ऐकून थोडें करुनी हास्यवदन निघोन गेले तेथोनिया ॥७॥ थोडया दूर अंतरावर एक होती साच विहीर तिकडे धांव अखेर घेतली स्वामीरायांनीं ॥८॥ स्वामी तिकडे जाऊं लागतां भास्कर झाला बोलतां उच्च स्वरें वेडया वृथा तिकडे कशाला जातोस ? ॥९॥ ती कोरडी ठणठणीत आहे विहीर जाण सत्य पाणी या एक कोसांत नाहीं कोठें जाण पिशा ॥११०॥ समर्थ बोलले त्यावरी ही सत्य तुझी वैखरी विहिरींत पाणी नाहीं जरी परी करितों प्रयत् ॥११॥ तुझ्यासारखे बुद्धिमान जलनिं होती हैराण तें मी नयनीं पाहून स्वस्थ ऐसा बसलों जरी ॥१२॥ तरी समाजहितासाठीं काय मी केली सांग गोष्टी साह्य होतो जगजेठी हेतु शुद्ध असल्यावर ॥१३॥ समर्थ आले विहिरीपाशीं तों थेंब नाहीं तियेशीं हताश होऊन वृक्षापाशीं बसले एका दगडावर ॥१४॥ डोळे मिटून केलें ध्यान चित्तीं सांठविला नारायण जो सच्चिदानंद दयाघन दीनोद्धार जगद्गुरु ॥१५॥ समर्थ म्हणती देवदेवा हे वामना वासुदेवा प्रद्युम्ना राघवा हे विठ्ठला नरहरी ! ॥१६॥ देवा ही आकोली पाण्यावांचून त्रस्त झाली वोलही ना राहिली कोठेंच देवा विहिरींतून ॥१७॥ मानवी यत् अवघे हरिले म्हणून तुजला प्रार्थिलें पाव आतां जगन्माउले पानी दे या विहिरीला ॥१८॥ तुझी करणी अघटीत जें घडें तें घडविसी सत्य मांजरें जळत्या आव्यांत पांडुरंगा ! तूं रक्षिलीं ॥१९॥ प्रल्हाद भक्त करण्या खरा स्तंभीं प्रगटलास जगदोद्धारा बारा गांव वैश्वानरा भक्षिलें त्वां गोकुळांत ॥१२०॥ कर नखाग्रीं धरिला गिरी तूंच कीं रे मुरारी तुझ्या कृपेची ये सरी जगत्रयीं कवणास ॥२१॥ दामाजीपंत ठाणेदार त्याच्यासाठीं झालास महार चोख्यासाठीं ओढीलीं ढोरं पांखरें रक्षिलीं माळ्याचीं ॥२२॥ उपमन्यूसाठीं भला क्षीरसमुद्र तुवां दिला तहान नामदेवाला मारवाडांत लागली जैं ॥२३॥ तैं तुम्ही कौतुक केलें निर्जलता प्रांतीं भलें नाम्यासाठीं भरविलें जल हें आण ध्यानांत ॥२४॥ ऐसें विनवितां ईश्वरा विहिरीलागीं फुटला झरा उफाळ्याचा साजिरा विहीर भरली क्षणामध्यें ॥२५॥ साह्य झाल्या जगन्नाथ काय एक ना तें होत ईश्वरी सत्ता अगाध सत्य जें ना घडे तेंच घडवी ॥२६॥ तेथ पाणी समर्थ प्याले तें भास्करानें पाहिलें चित्त त्याचें घोटाळलें कांहीं नच चाले तर्क त्याचा ॥२७॥ वर्षें झालीं द्वादश जल नाहीं या विहिरीस तिलाच एका घटकेस यानें जलमय केली कीं ॥२८॥ यावरुन हा कोणीतरी खचित आहे साक्षात्कारी बळेंच फिरतो पिशापरी हें आतां समजलें ॥२९॥ शेतीचें काम सोडून भास्कर आला धांवून धरितां झाला दृढ चरण मुखें स्तोत्र आरंभिलें ॥१३०॥ हे नरदेहधारी परमेश्वरा हे दयेच्या सागरा लेंकरासी कृपा करा अर्भक मी तुमचें असें ॥३१॥ तुम्हांतें ना जाणून मी बोललों टाकून आतां पस्तावा झाला पूर्ण क्षमा त्याची करा हो ॥३२॥ टाकून बोलतां गौळणी रागावला ना चक्रपाणी दयाळा बाह्य वेषांनीं तुझ्या मजला ठकविलें ॥३३॥ त्याचें तूंच निरसन केलें चमत्कार दाखवून भगवंताचें देवपण कृतीनेंच कळलें कीं ॥३४॥ तैसा तुझा अधिकार केवढा तरी आहे थोर तें कळलें साचार या जलाच्या कृतीनें ॥३५॥ कांहीं असो सद्गुरुनाथा मी सोडी तुम्हां आतां लेंकरानें भेटतां माये कोठें रहावें कीं ॥३६॥ खोटी ही प्रपंच माया आले आज कळोनिया आतां परते लोटा या दीना अर्भकाकारणें ॥३७॥  भास्करासी समर्थ म्हणती ऐसा होई दुःखित चित्तीं आतां घागर डोक्यावरती गांवांतून आणूं नको ॥३८॥ तुझ्यासाठीं हें जीवन विहिरींत केलें निर्माण आतां कशाची नुरली वाण मग का प्रपंच टाकिशी ? ॥३९॥ पाणी आलें तुझ्याकरितां बगीचा तो लाव आतां भास्कर म्हणे गुरुनाथा हें आमीष दावूं नका ॥१४०॥ माझा निश्चय हीच विहीर कोरडी ठणठणीत साचार होती दयाळा आजवर थेंब नव्हता पाण्याचा ॥४१॥ ती विहीर फोडण्याला तुम्हीच हा प्रयत् केला साक्षात्काराचा लाविला सुरुंग खडक फोडावया ॥४२॥ तेणें हा फुटला खडक भावाचें लागलें उदक आतां मला निःशंक भक्तिपंथाचा लावीन मी ॥४३॥ वृत्तीच्या मेदिनी ठायीं फळझाडें तीं लावीन पाही सन्नीतीची माझे आई तुझ्या कृपेंकरुन ॥४४॥ सत्कर्माचीं फुलझाडें लावीन मी जिकडे तिकडे हे क्षणैक बैलवाडे यांचा संबंध आतां नको ॥४५॥ पहा श्रोते संतसंगति क्षणैक घडतां भास्कराप्रती केवढी झाली उपरति याचा विचार करा हो ॥४६॥ खर्या संताचें दर्शन आगळें सर्व साधनांहून तुकारामें केलें वर्णन "संतचरणरजा" चे अभंगीं ॥४७॥ तो अभंग पहावा चित्तीं विचार करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा निजहिताकारणें ॥४८॥ पाणी लागलें विहिरीस ही वार्ता आसपास पसरतां जन दर्शनास धांवूं लागले स्वामीच्या ॥४९॥ मधूचा लागतां सुगावा जैशा मक्षिका घेती धांवा वा साखरेचा पाहून रवा मुंग्या येती धांवून ॥१५०॥ तैसे श्रोते तेथ आले लोक अपार मिळाले विहिरीचें पाणी पाहिलें पिऊन त्यांनीं तेधवां ॥५१॥ उदक निर्मळ शीत मधुर गोड अमृताहून फार करुं लागले जयजयकार गजाननाचा लोक सारे ॥५२॥ असो पुढें भास्करासहित अडगांवासी जातां परत महाराज आले शेगांवांत श्रीगजानन सिद्धयोगी ॥५३॥ स्वस्ति श्रीदासगणूविरचित हा गजाननविजय नामें ग्रंथ होवो जगासी आदर्शभूत संतमहिमा जाणावया ॥१५४॥ शुभं भवतु श्रीहरिहरार्पणमस्तु ॥इति पंचमोऽध्यायः समाप्तः

No comments:

Post a Comment