Creative Commons License
This work is licensed under a Creative Commons Attribution 4.0 International License. .: गजानन विजय ग्रंथ : अध्याय 8

गजानन विजय ग्रंथ : अध्याय 8



अध्याय

श्रीगणेशाय नमः हे वसुदेवदेवकीनंदना हे गोपगोपीमनरंजना हे दुष्टदानवमर्दना श्रीहरी पाव मातें ॥१॥ तुझ्या प्राप्तीचें साधन कर्मादिकांचें अनुष्ठान परा भक्तीचें सेवन करण्या आहे अपात्र मी ॥२॥ तुझीं ज्ञानदात्रीं शास्त्रें सारीं गीर्वाण भाषेभीतरीं त्यांचें सांग करुं हरी सेवन तें कवण्या रीतीं ॥३॥ गीर्वाणाचा नसे गंध त्यांतून माझी मती मंद कमलांतील मकरंद बेडुकाला मिळतो कसा ? ॥४॥ अन्नदानें तुझी प्राप्ति जरी करुन घेऊं श्रीपती तरी धनाचा अभाव निश्चिती दारिद्रय पदरीं बांधिलें त्वां ॥५॥ जरी करुं मी तीर्थयात्रा तरी सामर्थ्य नाहीं गात्रां तशांतही अंधत्व आतां आलें आहे दृष्टीतें ॥६॥ ऐसा सर्व बाजूंनीं मी हीनदीन चक्रपाणी दारिद्रयाचे मनीच्या मनीं जाती जिरोनी मनोरथ ॥७॥ हें व्यावहारिक दृष्टया खरें जरी परी तुझी कृपा झाल्यावरी स्वानंदाच्या सागरीं पोहत राहे अहोरात्र ॥८॥ तुझ्या कृपेचें महिमान आगळें आहे सर्वांहून घनाच्या पाण्यालागून दाम देण्याची गरज नसे ॥९॥ मेघांनीं आणिल्या मनांत तळीं विहिरी भरतात निवळ खडकास फुटतात पाट पाण्याचे पांडुरंगा ! ॥१०॥ ऐशा त्या तव कृपेचा दासगणू हा भुकेला साचा घास एखादा तरी त्याचा घाल माझ्या मुखांत ॥११॥ तेणें मी तृप्त होईन अवघ्या सुखातें पावेन अमृताचा लाभतां कण रोग सारे दूर होती ॥१२॥ असो मागील अध्यायीं देशमुख पाटलाठायीं मुक्कामातें दुफळीबाई येऊन बसली हें ऐकिलें ॥१३॥ जेथ जेथ ही नादे दुफळी तेथ तेथ ही करी होळी अवघ्या सुखाची रांगोळी इच्या पायीं होतसे ॥१४॥ क्षयरोग तो शरीराला वा दुफळी रोग समाजाला नेतसे यमसदनाला प्रयत् पडती लुळे तेथ ॥१५॥ असो तळ्याचिया कांठावर देशमुखांचा एक महार करुं लागला चरचर या खंडूपाटलापुढें ॥१६॥ पाटील गांवीचा अधिकारी पाटील गांवीची पांढरी कांहीं कामावरुन खरी कुरबुर झाली उभयतांत ॥१७॥ तो असे मर्या महार देशमुखांचा ज्याला जोर तो बोलला उणें उत्तर खंडू पाटलाकारणें ॥१८॥ पाटील वदला त्यावरी तुझी रीत ही नाहीं बरी गरीबानें पायरी आपली कधीं सोडूं नये ॥१९॥ उणीं उत्तरें बोलण्याचा अधिकार आहे देशमुखाचा तुझ्यासारख्या नकटयाचा नाहीं हें आण मनीं ॥२०॥ तरी महार ऐकेना करुं लागला चेष्टा नाना त्याच्या ऐकोनी भाषणा पाटील खवळला मानसीं ॥२१॥ बाचाबाचीचें कारण होतें अति क्षुल्लक जाण कागद ठाण्यालागून पाठवणें होते पाटलाला ॥२२॥ तो टप्पा न्यावयासी सांगितलें होतें महारासी कीं तूं असाच जा अकोल्यासी तहशिलींत टप्पा द्याया हा ॥२३॥ तें ऐकोनी वदला महार मी हा टप्पा नेणार देशमुखाच्या आश्रितावर तुमचा डोळा हमेशा ॥२४॥ कांहीं असो आज दिनीं मी टप्पा जाय घेवोनी तुझ्या हुकुमालागुनी बोंबा शिमग्याच्या समजतों मी ॥२५॥ ऐसें वदनीं बोलला हावभावही तैसा केला मूठ वळुनी हात नेला त्यानें आपल्या मुखापुढें ॥२६॥ ती त्याची पाहूनि कृती खंडू पाटील कोपला चित्तीं भरीव वेळूची काठी होती पाटलाच्या हातांत ॥२७॥ त्याच काठीचा केला प्रहार महाराचिया हातावर पाटील मूळचा जोरदार त्यानें रागें केला प्रहार हा ॥२८॥ त्या प्रहारें करुनी हात गेला मोडूनी महार बेशुद्ध होवोनी पडता झाला भूमीवर ॥२९॥ पाटील दुसर्या महाराला गेले टप्पा द्यावयाला तों इकडे वृत्तान्त कैसा झाला तो आतां सांगतों ॥३०॥ तो महार त्याच्या आप्तांनीं नेला उचलून देशमुखसदनीं मोडला हात हें पाहूनि देशमुख ते संतोषले ॥३१॥ वा ! वा ! छान गोष्ट झाली आपणां कुरापत काढण्या भली ही अनायासें संधी आली ती उपयोगी दवडणें ॥३२॥ त्यांनीं त्या महारासी तात्काळ नेलें कचेरीसी समाजविलें अधिकार्यासी खोटेंनाटें विबुध हो ॥३३॥ कोठेंही दोन पक्षांत वांकडें आल्या यत्किंचित् कांटयांचेच होतात नायटे ते अवलोका ॥३४॥ फिर्याद त्या महाराची पुस्तकांत नोंदली साची आज्ञा झाली अधिकार्याची पाटील पकडून आणावया ॥३५॥ शेगांवीं झाली पुकार उद्यां आहे पडणार पाटलाच्या पदीं थोर बेडी करीं हातकडया ॥३६॥ खंडू पाटला समजलें धाबें त्याचें दणाणलें तोंडचें पाणी पळालें झाला अति चिंतातुर ॥३७॥ ज्या शेगांवीं मी वाघापरी वागत होतों आजवरी तेथेंच कां हा श्रीहरी प्रसंग आणिला बेंडीचा ॥३८॥ अब्रुदारास अपमान वाटे मरणाहून मरण बंधु गेले घाबरुन कांहीं विचार सुचेना ॥३९॥ खंडू हताश होऊन बसला तों एक विचार सुचला त्याला श्रीगजानन महाराजाला सांकडें हें घालावें ॥४०॥ त्या साधूचे वांचून या संकटाचें निरसन करणारा कोणी आन राहिला या वर्हाडीं ॥४१॥ लौकिकीं यत् करण्याला बंधु गेले अकोल्याला खंडू पाटील नीट आला समर्थांकडे रात्रीस ॥४२॥ येतांच केला नमस्कार शिर ठेविलें पायांवर महाराज आला कठीण फार प्रसंग तो माझ्यावरी ॥४३॥ सरकारी कामानिमित्त मी एका महाराप्रत तळ्यापाशीं ताडिलें सत्य करांतील काठीनें ॥४४॥ त्याचा ऐसा परिणाम झाला कांटयाचा नायटा केला देशमुख मंडळींनीं भला माझें अहित करण्यास ॥४५॥ त्यानिमित्त कैद मला होण्याचा उद्यां प्रसंग आला समर्था माझ्या इज्जतीला तुजवीण कोण रक्षील ? ॥४६॥ उद्यां येतील राजदूत मला येथूनि नेण्याप्रत बेडी ठोकोनि पायांत ऐसें आज ऐकिलें ॥४७॥ त्यापेक्षां गुरुवरा गळा माझा येथेंचि चिरा ही घ्या तलवार देतों करां वेळ करुं नका हो ॥४८॥ अब्रुदाराकारण बेइज्जत हेंच मरण अपराध माझा त्यांतून अति अल्प दयाळा ॥४९॥ त्या अपराधरुपी खडयाचा हा डोंगर झाला साचा अभिमान माझ्या अब्रूचा धरा समर्था ये काळीं ॥५०॥ जयद्रथाच्या वेळेला अग्निकाष्ठ भक्षिण्याला होता अर्जुन तयार झाला केवळ आपुल्या अब्रूस्तव ॥५१॥ तेथें भगवंतानें भली अब्रू त्याची रक्षण केली प्रभूनें वस्त्रें नेसविलीं द्रौपदीला सभेंत ॥५२॥ तेवीं मम अब्रूही पांचाळी देशमुख कौरवांनीं आणिली नग्न करण्यासाठीं भली तिचें करा हो रक्षण ॥५३॥ ऐसें वदून समर्थाला पाटील रडूं लागला आसवांचा तो चालला पूर नेत्रांवाटें हो ! ॥५४॥ घरचीं माणसें चिंतातुर आधींच झालीं होतीं फार नाहीं त्यांच्या शोका पार तो सांगावा कोठवरी ? ॥५५॥ इकडे समर्थांनीं भले दोन्ही हातीं कवटाळिलें खंडू पाटला हृदयीं धरिलें त्याचें सांत्वन करावया ॥५६॥ अरे ! कामकर्त्या पुरुषाप्रत ऐशीं संकटें येतात वरच्यावरी जाण सत्य त्याची चिंता वाहूं नको ॥५७॥ स्वार्थदृष्टि बळावतां ऐसेंच होतें तत्त्वतां खर्या नीतीची ती वार्ता अणुमात्र त्या कळत नसे ॥५८॥ तुम्ही पाटील देशमुख दोघेजण एका जातीचे असून एकमेकांचें नुकसान स्वार्थें करुं पाहतां ॥५९॥ मागें कौरवपांडवांत स्वार्थेंच आला विपट सत्य परि पांडवांचा पक्ष तेथ न्यायें खरा होता कीं ॥६०॥ म्हणून पांडवांकारणें साह्य केलें भगवंतानें सत्यासाठीं मारणें भाग पडलें कौरवांना ॥६१॥ जा भिऊं नकोस तिळभर बेडी तुशीं पडणार किती जरी केला जरी केला जोर देशमुखानें आपला ॥६२॥ तेंच पुढें खरें झालें पाटील निर्दोषी म्हणून सुटले जें कां संतमुखावाटें आलें तें खोटें होई कधीं ॥६३॥ पाटील मंडळी उत्तरोत्तर भजूं लागली साचार कोणा नाहीं आवडणार अमृत तें सेवावया ? ॥६४॥ पुढें खंडू पाटलानें करुन विनंति प्रेमानें नेलें रहायाकारणें समर्थाला निजगृहीं ॥६५॥ असतां पाटील सदनांत गजाननस्वामी समर्थ ब्राह्मण आले अवचित दहापांच तैलंगी ॥६६॥ तैलंगी विद्वान असती कर्मठ वेदावरी प्रीती परी धनाचा लोभ चित्तीं राही ज्यांच्या विशेष ॥६७॥ तें कांहीं मिळेल म्हणून समर्थाकडे आले जाण तयीं होते पांघरुण घेऊन समर्थ निजलेले ॥६८॥ त्यांना जागे करण्याप्रत ब्राह्मण म्हणूं लागले मंत्र जटेचे ते स्वरासहित अति उच्च स्वरानें ॥६९॥ मंत्र म्हणण्यांत चूक झाली ती त्यांनीं दुरुस्त केली म्हणून आसनीं उठून बसली गजाननाची स्वारी पहा ॥७०॥ आणि ऐसें वदले ब्राह्मणांला तुम्ही कशासाठीं वैदिक झालां हीनत्व वेदविद्येला आणूं नका रे निरर्थक ॥७१॥ ही विद्या पोटाची मोक्षदात्री आहे साची वा डोईस बांधल्या शालीची किंमत कांहीं राखा हो ॥७२॥ मी म्हणतों ऐसें म्हणा खरे स्वर मनीं आणा उगीच भोळ्या भाविकांना सोंग आणून नाडूं नका ॥७३॥ जी ऋचा ब्राह्मणांनीं म्हणण्या सुरुं केली जाणी तोच अध्याय समर्थांनीं धडधड म्हणून दाखविला ॥७४॥ चूक कोठें म्हणण्यांत शब्दोच्चार स्पष्ट सत्य वाटे वसिष्ठ मूर्तिमंत वेद म्हणण्या बसला असे ॥७५॥ तेलंगी तें ऐकून चकित झाले अधोवदन बैसले मुख वरी करण्या आपुलें भय मनीं वाटलें त्यां ॥७६॥ सूर्य उदय झाल्यावर त्याच्यापुढें कां होणार दीपांचा तो जयजयकार त्यांची किंमत अंधारीं ॥७७॥ विप्र म्हणती आपुल्या मनीं हा पिसा कशाचा महाज्ञानी चारी वेद याच्या वदनीं नांदतात प्रत्यक्ष ॥७८॥ हा विधाताच होय दुसरा शंका येथें नुरली जरा हा असावा ब्राह्मण खरा जातीनें कीं निःसंशय ॥७९॥ परमहंस दीक्षा याची वार्ता उरली बंधनाची कोणत्याही प्रकारची हा जीवन्मुक्त सिद्धयोगी ॥८०॥ कांहीं पुण्य होतें पदरीं म्हणून मूर्ति पाहिली खरी हा वामदेव याला दुसरी उपमा ती द्यावया ॥८१॥ असो खंडू पाटलाकडून त्या ब्राह्मणांलागून देते झाले दयाघन रुपया रुपया दक्षिणा ॥८२॥ ब्राह्मण संतुष्ट झाले अन्य गांवां निघून गेले महाराजही कंटाळले उपाधीला गांवच्या ॥८३॥ श्रोते खर्या संताप्रत उपाधी ना असे पटत दांभिकाला मात्र भूषण होतें तियेचें ॥८४॥ गांवाचिया उत्तरेला एक मळा सान्निध्याला या मळ्यांत भाजीपाला होत होता बहुवस ॥८५॥ एक शिवाचें मंदिर तेथें होतें साचार लिंबतरुंची थंडगार छाया होती ते ठायीं ॥८६॥ हा कृष्णाजी पाटलाचा मळा होता मालकीचा हा कृष्णाजी खंडुजीचा सगळ्यांत शेवटला भाऊ असे ॥८७॥ त्या मळ्यांत महाराज आले शिवालयासन्निध बसले एका ओटयावरी भले निंबतरुच्या छायेंत ॥८८॥ समर्थ म्हणाले कृष्णाजीसी मी आलों तुझ्या मळ्यासी कांहीं दिवस राहावयासी या श्रीशंकरासन्निध ॥८९॥ हा भोलानाथ कर्पूरगौर नीलकंठ पार्वतीवर हा राजराजेश्वर आहे अवघ्या देवांचा ॥९०॥ तो तुझ्या मळ्यांत रमला म्हणून मींही विचार केला येथें येण्याचा तो भला दे साउली करुन ॥९१॥ तें वाक्य ऐकिलें सहा पत्रे आणविले ओटयावरी छप्पर केलें कृष्णाजीनें तात्काळ ॥९२॥ समर्थांनीं वास केला म्हणून मला क्षेत्र झाला राजा जाय जया स्थला मीच होते राजधानी ॥९३॥ महाराजांचे बरोबर होता पाटील भास्कर सेवा करण्या निरंतर दुसरा तुकाराम कोकाटया ॥९४॥ खाण्यापिण्याची तरतूद सारी निजांगें कृष्णाजी पाटील करी समर्थ ते जेवल्यावरी तो प्रसाद घेत असे ॥९५॥ असो गजानन असतां मळ्यांत गोष्ट घडली अद्भुत येते झाले फिरत फिरत दहा वीस गोसावी ते ठायां ॥९६॥ समर्थांचा बोलबाला त्यांनीं आधींच होता ऐकिला म्हणूनि त्यांनीं तळ दिला येऊनि या मळ्यामध्यें ॥९७॥ गोसावी म्हणती पाटलासी आम्ही आहों तीर्थवासी जातों रामेश्वरासी भागीरथीला घेऊन ॥९८॥ गंगोत्री जम्नोत्री केदार हिंगलाज गिरनार डाकुर ऐशीं क्षेत्रें अपार पाहिलीं पायीं फिरुनी ॥९९॥ ब्रह्मगिरी गोसाव्याचे आम्ही शिष्य आहों साचे महाराजही आमुचे आहेत सांप्रत बरोबर ॥१००॥ 

हे महासाधु ब्रह्मगिरी ज्यांचा बंदा गुलाम हरी ती मूर्ति आली घरीं तुझ्या पूर्वभाग्यानें ॥१॥ शिरापुरीचें अयाचित आम्हां द्यावें तुम्ही त्वरित लागे जो ओढण्याप्रत गांजा तोही पुरवावा ॥२॥ तीन दिवस येथें राहूं चौथे दिवशीं येथून जाऊं पाटील नका कष्टी होऊं साधून घ्या ही पर्वणी ॥३॥ तुम्ही पोशिला मळ्यांत वेडा पिसा नंगाधूत मग आम्हां देण्या अयाचित मागें पुढें कां पाहतां ? ॥४॥ गाढवासी पोशिती गाईस लाथा मारिती ते का म्हणावें सन्मती पहा विचार करुन ॥५॥ आम्ही गोसावी वैराग्यभरित जाणतों अवघा वेदान्त मर्जी असल्या मळ्यांत या पोथी ऐकावया ॥६॥ कृष्णाजी म्हणे त्यावरी उद्यां घालीन शिरापुरी आज आहेत भाकरी त्याच जाव्या घेऊन ॥७॥ जितुका गांजा ओढाल तितुका तेथेंच मिळेल तेथें चालता बोलता कंठनीळ बसला आहे पत्र्यामध्यें ॥८॥ दोन प्रहराची वेळा खरी घेतल्या चूण भाकरी मळ्यांत घेउनि विहिरीवरी बसले गोसावी भोजना ॥९॥ समर्थांच्या समोरी एका छपराभीतरीं गोसाव्यांनीं लाविली खरी आपआपलीं कडासनें ॥११०॥ त्यांचा जो होतो महंत ब्रह्मगिरी नामें सत्य तो भगवद्गीतेप्रत वाचूं लागला अस्तमानीं ॥११॥ गोसावी श्रवणा बैसले गांवांतूनही कांहीं आले पोथी ऐकावया भले त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची ॥१२॥ "नैनं छिन्दन्ति" हा श्लोक निरुपणाचा होता देख ब्रह्मगिरी पक्का दांभिक स्वानुभवाचा लेश नसे ॥१३॥ निरुपण त्याचें ऐकिलें गांवकर्यास नाहीं पटलें ते आपसांत बोलूं लागले हा नुसता शब्दच्छल ॥१४॥ सारे पोथी ऐकिल्यावरी येऊन बसले पत्र्याभीतरीं गजाननाच्या समोरी संतदर्शन घ्यावया ॥१५॥ लोक म्हणती छपराला निरुपणाचा भाग झाला येथें पत्र्यास बैसला स्वानुभवाचा पुरुष हा ॥१६॥ तेथें ऐकला इतिहास येथें पाहिला प्रत्यक्ष पुरुष या भाषणें गोसाव्यास राग आला कांहींसा ॥१७॥ अवघे गोसावी गांजा प्याया बसले होते घेऊनिया त्या पत्र्याचिया ठायां चालली चिलीम गांजाची ॥१८॥ पत्र्यांत पलंगाच्या वरी बसली होती समर्थस्वारी चिलीम भरुन वरच्यावरी प्याया देई भास्कर ॥१९॥ त्या चिलिमीच्या विस्तवाची ठिणगी पलंगीं पडली साची ती पडतांना कोणाची दृष्टि गेली तिच्यावर ॥१२०॥ कांहीं वेळ गेल्यावर निघूं लागला धूर पलंग पेटला अखेर एकदम चहूं बाजूंनीं ॥२१॥ तो प्रकार पाहतां भास्कर बोले सद्गुरुनाथा पलंग सोडा शीघ्र आतां या खालीं उतरुन ॥२२॥ लाकडें हीं पलंगाचीं आहेत कीं सागाचीं तीं आतां विझायाचीं पाण्यावांचून दयाळा ॥२३॥ तयीं समर्थ बोलले वाचें भास्करा अग्नि विझविण्याचें कारण नाहीं तुला साचें जल मुळींच आणूं नको ॥२४॥ अहो महाराज ब्रह्मगिरी या बैसा पलंगावरी तुम्हां आहे अवगत खरी भगवद्गीता साकल्यें ॥२५॥ त्याच्या परीक्षेची वेळ आणिली हरीनें तात्काळ ब्रह्मा जाळी अनळ याचा प्रत्यय दाखवा ॥२६॥ "नैनं छिन्दन्ति" श्लोकावर व्याख्यान केलें एक प्रहर आतां कां मानितां दर या पलंगीं बसण्याचा ? ॥२७॥ जा भास्करा लौकरी ब्रह्मगिरीला करीं धरी आणून बसवी अत्यादरीं या जळत्या पलंगास ॥२८॥ ऐशी आज्ञा होतां क्षणीं भास्कर गेला धांवोनी ब्रह्मगिरीचा सव्य पाणी धरिला त्यानें निजकरें ॥२९॥ भास्कराचें शरीर धिप्पाड सशक् पिळदार तो गोसावि त्याच्या समोर शोभूं लागला घुंगुरडें ॥१३०॥ पलंग पेटला चौफेर ज्वाळा निघूं लागल्या थोर परी महाराज आसनीं स्थिर हलले मुळीं इतकेंही ॥३१॥ श्री प्रल्हाद कयाधूसुत उभा केला अग्नींत हें लिहिलें पुराणांत श्रीव्यासांनीं भागवतीं ॥३२॥ त्या लिहिल्या गोष्टीचें प्रत्यंतर दाविलें साचें मळ्यामाजीं कृष्णाजीचें श्रीगजानन साधूंनीं ॥३३॥ ब्रह्मगिरी म्हणे भास्कराशीं मला न्या पलंगापाशीं महाराजांच्या अधिकाराशीं मीं नाहीं जाणितलें ॥३४॥ तें मानी भास्कर ओढीत आणिला फरफर उभा केला समोर आपल्या सद्गुरुरायाच्या ॥३५॥नैनं दहति पावक हें खरें करुन दावा वाक्य ऐसें बोलतां महाराज देख गोसावी परम घाबरला ॥३६॥ गोसावी म्हणे भीत भीत मी पोटभर्या आहे संत शिरापुरी खाण्याप्रत मी झालों गोसावी ॥३७॥ माझ्या अपराधाची क्षमा साच करी शांतिधामा केला खटाटोप रिकामा गीताशास्त्र शिकण्याचा ॥३८॥ तुला पिसा मी म्हणालों आतां पस्तावा पावलों मी दांतीं तृण धरुन आलों शरण तुला अभय दे ॥३९॥ शेगांवच्या जनांनीं केली समर्थां विनवणी आपणा अग्नीपासूनी भय नाहीं हें खरें ॥१४०॥ तरी महाराज आमच्याकरितां खालीं यावें लवकर आतां अशा स्थितींत पाहतां तुम्हां आम्हां धडकी भरे ॥४१॥ म्हणून आमच्यासाठीं उतरा खालीं ज्ञानजेठी गोसावी झाला हिंपुटी तो कांहीं बोलला ॥४२॥ लोक विनंतीस द्याया मान खालीं उतरले गजानन तो पलंग पडला कोसळून एक पळही लागलें त्या ॥४३॥ अवघाच होता जळला जो भाग शेष उरला तो लोकांनीं विझविला साक्ष दावण्या इतरांसी ॥४४॥ ब्रह्मगिरी पायीं लागला निरभिमान अवघा झाला स्पर्श होता गंगाजला मल कोठूनी राही तेथ ? ॥४५॥ मग मध्यरात्रीच्या समयाला ब्रह्मगिरीस बोध केला आजपासून चेष्टेला तूं या सोडून देईं रे ॥४६॥ ज्यांनीं राख लावावी त्यांनीं उपाधी दूर ठेवावी अनुभवावीण सांगावी गोष्ट कोणा निरर्थक ॥४७॥ नुसतें शब्दपांडित्य माजलें जगीं अतोनात तेणेंच आहे झाला घात आपुल्या या संस्कृतीचा ॥४८॥ गोसावी मच्छिंद्र जालंदर गोरख गहिनी साचार ज्ञानेश्वराचा अधिकार किती म्हणून सांगावा ॥४९॥ स्वानुभवाचे झाले यती श्रीशंकराचार्य निश्चितीं प्रपंचीं राहून ब्रह्मस्थिति अनुभविली एकनाथांनीं ॥१५०॥ स्वामी समर्थ ब्रह्मचारी हेही ब्रह्मसाक्षात्कारी होऊन गेले भूमीवरी यांचीं चरित्रें आणी मना ॥५१॥ उगीच खाया शिरापुरी भटकूं नको भूमीवरी सार तयामाझारीं येतुलेंही गवसणार ॥५२॥ ऐसा बोध ऐकिला ब्रह्मगिरी विरक्त झाला प्रातःकाळींच उठोन गेला कोणा भेटतां शिष्यांसह ॥५३॥ ही गोष्ट दुसर्या दिवशीं कळली अवघ्या गांवासी जो तो आला पाहावयासी मळ्यांत जळलेल्या पलंगातें ॥५४॥ हा दासगणूविरचित गजाननविजय नामें ग्रंथ तारो भाविकां भवाब्धींत हेंचि इच्छी दासगणू ॥१५५॥ शुभं भवतु श्रीहरिहरार्पणमस्तु ॥इति अष्टमोऽध्यायः समाप्तः

No comments:

Post a Comment