Creative Commons License
This work is licensed under a Creative Commons Attribution 4.0 International License. .: गजानन विजय ग्रंथ : अध्याय 15

गजानन विजय ग्रंथ : अध्याय 15


अध्याय १५


श्रीगणेशाय नमः हे कश्यपात्मज वामना हे बटुरुपधारी नारायणा तूं बलीच्या घेऊन दाना कृतार्थ त्याला केलेंस ॥१॥ राज्य मृत्युलोकीचें घेतलें त्वां जरी साचें तरी दिलें पाताळाचें राज्य बलीकारणें ॥२॥ आंवळा घेऊन नारळ दिला तुम्ही त्या पुण्यवंत बलीला आणि त्याच्या भक्तीस्तव झाला द्वारपाळ द्वारीं तुम्ही ॥३॥ या मन्वंतरानंतर बलीच आहे होणार देवांचा राजराजेश्वर देवा तुझ्या वरानें ॥४॥ एक घटकेंत अनंता चहूं वेदांच्या संहिता पठण केल्या बुद्धिमत्ता केवढी तुझी अगाध तरी ! ॥५॥ अवघ्यां तुझ्या अवतारीं हा सोंवळा अवतार श्रीहरी कोणाचाही भूमीवरी वध तुम्ही केलांत ॥६॥ शत्रुमित्राच्या घरीं दिवा ये अवतारीं लाविला बरवा देव आणि दानवा तूं वंद्य सारखाच ॥७॥ देव तेही आनंदविले राक्षस तेही रक्षिलें आपलें ईशत्व सांभाळिलें याच अवतारीं देवा तूं ॥८॥ तुला माझा नमस्कार असो वामना वारंवार मस्तकीं ठेवा वरद कर तुम्ही दासगणूच्या ॥९॥ टिळक बाळ गंगाधर महाराष्ट्राचा कोहिनूर दूरदृष्टिचा सागर राजकारणीं प्रवीण जो ॥१०॥ निज स्वातंत्र्याच्यासाठीं ज्यानें अनंत केल्या खटपटी ज्याची धडाडी असे मोठी काय वर्णन तिचें करुं ? ॥११॥ करारी भीष्मासमान आर्य महीचें पाहून दैन्य सतीचे झाला घेतां वाण भीड सत्यांत कोणाची ॥१२॥ वाक्चातुर्य जयाचें बृहस्पतीच्या समान साचें धाबें दणाणें इंग्रजांचें पाहून ज्याच्या लेखाला ॥१३॥ कृति करुन मेळविली ज्यानें लोकमान्य ही पदवी भली ती कोणी त्यांना दिली ऐसा होता बहाद्दर ॥१४॥ तो एके वेळीं अकोल्याला शिवजयंतीच्या उत्सवाला लोकाग्रहें येतां झाला व्याख्यान द्याया कारणें ॥१५॥ झाली तयारी उत्सवाची त्या अकोल्यामध्यें साची मोठमोठाल्या विद्वानांची गेली गडबड उडून ॥१६॥ दामले, कोल्हटकर, खापर्डे आणखी विद्वान्बडेबडे जमते झाले रोकडे तया अकोल्या ग्रामासी ॥१७॥ अध्यक्ष त्या उत्सवाचे नेमिले होते टिळक साचे नांव ऐकतां टिळकांचें वर्हाड सारें आनंदलें ॥१८॥ शिवरायाची जयंती याच्या आधींच या प्रांतीं झाली पाहिजे होती त्याचें कारण ऐसें पहा ॥१९॥ शिवाजीची जन्मदात्री जी वीरमाता जिजा सती ती वर्हाडीच आपुली होती सिंधखेडीं जन्म जिचा ॥२०॥ त्या वीरगाजी शिवाजीला जिनें पोटीं जन्म दिला वर्हाडमहाराष्ट्र एक झाला या सतीच्या कर्तृत्वें ॥२१॥ माता होती वर्हाडी पिता महाराष्ट्री शहाजी गडी अवघ्या दंपत्यांत ही जोडी खचित होती अनुपम ॥२२॥ आधींच उत्सव शिवाजीचा जो कलिजा महाराष्ट्राचा आणखी वरी अध्यक्ष त्याचा टिळक बाळ गंगाधर ॥२३॥ आधीं एक महिना तयारी उत्सवाची चालली खरी ज्याच्या त्याच्या अंतरीं आनंद होत चालला ॥२४॥ अध्यक्ष उपाध्यक्श निवडले स्वयंसेवक तयार झाले तईं कईकांचें म्हणणें पडलें ऐशा रीतिं विबुध हो ॥२५॥ या शिवजयंती उत्सवाला आणा शेगांवचे महाराजाला श्रीस्वामी समर्थ गजाननाला म्हणजे दुधांत साखर पडेल कीं ॥२६॥ शिवाजीच्या राष्ट्रोद्धारा आशीर्वाद होता खरा समर्थांचा साजिरा म्हणून तडीस गेला तो ॥२७॥ टिळकांचें राजकारण हेंच जिजाई-हृदय-रत् त्याला पाहिजे आशीर्वचन समर्थंचि विबुध हो ॥२८॥ ते कित्येकां पसंत पडलें कित्येकांस नाहीं रुचलें ज्यां रुचले ते बोलले उघड उघड येणें रीतिं ॥२९॥ तो शेगांवाचा अवलिया कशास आणितां ये ठायां तो कांहीं तरी करुनियां विक्षोभ करील सभेचा ॥३०॥ फिरेल नागवा सभेंत "गिण गिण गणांत" ऐसा म्हणत मारील वाटे कदाचित् तो लोकमान्याला ॥३१॥ कांहीं लोक बोलले हें म्हणणें चांगलें गजाननाचीं पाउलें लागलीं पाहिजेत सभेला ॥३२॥ त्याचें जें कां वेडेपण तें आहे वेडयाकारण जे कोणी विद्वान् सज्जन त्यासी वदती वेडयापरी ॥३३॥ खरेखुरे राष्ट्रोद्धारक जरी टिळक असतील एक तरी महाराज निःशंक सभेसी येतील ये ठायां ॥३४॥ खर्याखोटयाची परीक्षा साधूच हे करिती देखा म्हणून सांगतों भिऊं नका त्यांना आमंत्रण देण्यास ॥३५॥ ऐसी भवति भवति झाली मंडळी शेगांवास आली आमंत्रण तें द्याया भली सभेचें श्रीगजानन ॥३६॥ येतांच दादा खापडर्यासी बोलते झाले पुण्यराशी आम्ही येऊं सभेसी तुमच्या शिवाजी उत्सवाच्या ॥३७॥ वेडयापरी तेथें करुं जागींच बसून मौन धरुं सुधारकांचा कधीं करुं मनोभंग मनाचा ॥३८॥ करावयासी राष्ट्रोद्धार योग्य बाळ गंगाधर याच्या परी होणार राष्ट्रप्रेमी पुरुष पुढें ॥३९॥ स्नेही त्या टिळकाचा अण्णा पटवर्धन नांवाचा शिष्य नरसिंहसरस्वतीचा आळंदीचा असे जो ॥४०॥ त्या दोघां पुरुषां पाहाण्यास आम्ही येऊं अकोल्यास तें ऐकतां खापर्डयास अती आनंद जाहला ॥४१॥ पाहा पाहा कोल्हटकरा वर्हाडप्रांताचा ज्ञानहिरा यानें वृत्तान्त जाणिला सारा जो का झाला अकोल्यांत ॥४२॥ यावरुन संतांचें ज्ञान केवढें अगाध साचें खर्या राष्ट्रपुरुषाचें प्रेम यांना पाहा किती ! ॥४३॥ बोलावयाची आपणांस जरुर पडली कांहीं खास तेच होऊन आपणांस येतो म्हणून म्हणाले ॥४४॥ मुहूर्त या उत्सवाला अती उत्तम लागला चला वंदून समर्थाला आपण जाऊं अकोल्यास ॥४५॥ खापर्डे कोल्हटकर निघून गेले साचार आला आठ दिवसांवर सभेचा तो दिवस पाहा ॥४६॥ वर्हाड सारें आनंदलें ज्यांना त्यांना वाटलें कधीं टिळकांचीं पाउलें पाहूं आम्ही अकोल्यांत ॥४७॥ शके अठराशें तिसासी ती सभा होती वैशाखमासीं वर्हाडप्रांतीं अकोल्यासी उभारिलेल्या मंडपांत ॥४८॥ सण अक्षय्यतृतीयेचा वर्हाडप्रांतीं महत्त्वाचा परी समुदाय जनांचा मिळता झाला प्रचंड ॥४९॥ तोच अखेरीचा दिन त्या सभेचा होता जाण लोक आले लांबलांबून लोकमान्यांसी पहावया ॥५०॥ शिवाय श्रोते त्या दिवशीं महाराज येणार सभेसी ऐसी खबर लोकांसी आधींच होती विबुध हो ॥५१॥ मंडप चिकार भरुन गेला जो तो पाहूं लागला म्हणती कां हो सभेला अजूनी आले महाराज ॥५२॥ परी ते सभा भरण्याआधीं येऊन बसले मंडपामधीं साधु आपल्या वाणीस कधीं असत्यता येऊं दे ॥५३॥ सभेमाजीं उच्च स्थानीं बसले होते कैवल्यदानी गादीस लोडा टेकूनी जीवनमुक्त साधुवर ॥५४॥ सिंहासनाच्या अग्रभागा टिळकास दिली होती जागा त्यांच्या सन्निध बसले बघा अण्णासाहेब पटवर्धन ॥५५॥ श्रीकृष्णाचा नंदन गणेश ज्याचें नामाभिधान खापर्डे कुलाचा कुलभूषण एक्या बाजूस टिळकाच्या ॥५६॥ दामले कोल्हटकर त्या ठायीं भावे व्यकंटराव देसाई सभेचे पुढारी पाही चमकत होते ते ठायां ॥५७॥ आणिक व्याख्याते विद्वानेतर बसले होते सभोंवार त्यांचें वर्णन कोठवर करावें मी एक्या मुखें ॥५८॥ सभेलागीं आरंभ झाला हेतु प्रथम निवेदिला मग व्याख्यानसिंह उठला टिळक बोलावयातें ॥५९॥ "दिवस आजचा धन्य धन्य आहे पहा हो सज्जन स्वातंत्र्यासाठीं ज्यानें प्राण खर्चिले आपुले पूर्वकालीं ॥६०॥ त्या धनुर्धर योध्याची वीर गाजी शिवाजीची जन्म-जयंति आहे साची म्हणून आपण मिळालों ॥६१॥ त्या रणगाजी शिवाजीला रामदासें हातीं धरिला म्हणून त्याचा बोलबाला झाला भरतखंडामध्यें ॥६२॥ तेवींच आज येथें झालें आशिर्वाद द्याया आले श्रीगजानन साधु भले आपुलीया सभेस ॥६३॥ म्हणून शिवाजीचे परी सभा यशस्वी होवो खरी अशाच सभेची जरुरी आहे सांप्रत राष्ट्राला ॥६४॥ स्वातंत्र्यसूर्य मावळला दास्यत्वाचा काळोख पडला स्वातंत्र्य नाहीं जगीं ज्याला तो समाज प्रेतवत् ॥६५॥ यासाठीं म्हणून आहे करणें प्रयत् ज्या शिक्षणेंकरुन राष्ट्रप्रेम वाढेल हो ॥६६॥ ऐसें शिक्षण पुढिल्यांप्रती देणें भाग निश्चिती तें शिक्षण हा भूपती देईल कां हो अर्भकांला ?" ॥६७॥ ऐसें टिळक म्हणाले महाराज आसनीं उठून बसले गर्जून त्रिवार बोलले नाहीं नाहीं ऐसें पहा ॥६८॥ आवेशाच्या भरांत बोलले गंगाधरसुत जें बोलणें किंचित् टोचून होतें राजाला ॥६९॥ त्या भाषणाचा रोख भला समर्थांनीं जाणिला आणि हांसत हांसत शब्द केला ऐशा रीतिं श्रोते हो ॥७०॥ अरे अशानेंच पडतात काढण्या दोन्ही दंडांप्रत ऐसें बोलून गणगणांत भजन करुं लागले ॥७१॥ सभा निर्विघ्न पार पडली टिळकांची वाहवा झाली खरें झालें त्याच सालीं समर्थांचें भाकित ॥७२॥ भूपतीनें टिळकाला एकशें चोवीसाखालीं धरिला दोर्या पडल्या दंडाला आला प्रसंग शिक्षेचा ॥७३॥ राजसत्तेचिया पुढें कोणाचेंही चाले घोडें वकील होते बडे बडे ते झटूं लागले टिळकास्तव ॥७४॥ प्रेमी मंडळी टिळकांची जी कां होती जिव्हाळ्याची त्यांनीं पारमार्थिक उपायाची केली योजना एक अशी ॥७५॥ दादासाहेब खापर्डे हेही होते गृहस्थ बडे ते उमरावतीहून मुंबईकडे जाऊं लागले खटल्यास्तव ॥७६॥ अकोल्याच्या स्टेशनावरी कोल्हटकरास मधुरोत्तरीं बोलते झाले ऐशापरी तें थोडकें सांगतों ॥७७॥ तुम्ही जावें शेगांवासी समर्था विनंती करा ऐसी सोडवा बाळ टिळकासी प्रसंग मोठा दुर्धर ॥७८॥ मीच गेलों असतों तेथें परी मी जातों मुंबईतें तुम्ही जाऊन शेगांवातें विनंती करा महाराजा ॥७९॥ लगेंच बसला गाडींत कोल्हटकर टिळक-भक्त येतां झाला शेगांवांत स्वामी गजाननाकडे ॥८०॥ तईं महाराज मठातें निज आसनीं निजून होते तीन दिवस जहाले पुरते परी उठले यत्किंचित्॥८१॥ कोल्हटकरहि तोंवरी बसला मठाभीतरीं जो का असेल बिगारी तो ऐसें वागे कदा ॥८२॥ कळकळ टिळकाविषयींची कोल्हटकरा पूर्ण साची कमाल त्यानें चिकाटीची केली असे आपुल्या ॥८३॥ जाळावांचून नाहीं कड मायेवांचून नाहीं रड ऐसी आहे एक जाड म्हण मराठी भाषेमध्यें ॥८४॥ चवथें दिवशीं समर्थ उठले कोल्हटकरास बोलते झाले तुम्ही अलोट प्रयत् केले परी फळ येईल त्या ॥८५॥ अरे छत्रपती शिवाजीला रामदासाचा वशिला होता परी तो कैद झाला बादशाही अमंलांत ॥८६॥ सज्जनास त्रास झाल्याविना राज्यक्रांति होईना कंसाचा तो मनीं आणा इतिहास म्हणजे कळेल ॥८७॥ ही मी देतों भाकर ती खाऊं घाला लवकर टिळकांप्रती अंतर यांत कांहीं करुं नका ॥८८॥ या भाकरीच्या बळावरी तो मोठी करील कामगिरी जातो जरी फार दूरी परी त्याला इलाज ॥८९॥ ऐसें ऐकतां उत्तर साशंक झाले कोल्हटकर समर्था करुन नमस्कार भाकर करीं घेतली ॥९०॥ ती नेऊन मुंबईला घातली टिळकास खायाला वृत्तान्त तोही कथन केला अथपासून इतिवरी ॥९१॥ तो ऐकून लोकांप्रत टिळक बोलले हंसत हंसत स्वामींचें तें अगाध सत्य ज्ञान आहे खचित पहा ॥९२॥ यश तुमच्या प्रयत्नासी नाहीं निश्चयेंसी आपुली बाजू रक्षण्यासी सरकार न्याया पाळीन ना ॥९३॥ जेव्हां स्वार्थाचा संबंध नसतो तेव्हां न्याय आठवतो हा जगाचा सिद्धान्त तो होईल खोटा कोठूनी ? ॥९४॥ माझ्या हातें कामगिरी मोठी होणार आहे खरी ऐशी समर्थांची वैखरी बोलली हें गूढ एक ॥९५॥ भूत भविष्य वर्तमान जाणताती साधुजन आपण मनुष्य सामान्य पाहूं पुढें काय होतें ॥९६॥ प्रसाद म्हणून भाकरी ती कुसकरुन भक्षिली खरी दंत मुखाभीतरीं परी प्रसाद टाकवेना ॥९७॥ झाली शिक्षा टिळकास नेलें ब्रह्मदेशीं मंडाल्यास तेथें जन्मला गीतारहस्य गीतेवरील ग्रंथ त्यांचा ॥९८॥ हीच मोठी कामगिरी झाली त्यांच्या हस्तें खरी मान जगत्‌-गुरुपरी मिळता झाला टिळकांतें ॥९९॥ या गीताशास्त्रावर टीका झाल्या अपार त्या सांगूं तरी कोठवर ? मति नाहीं दासातें ॥१००॥ बुध हो प्रत्येक आचार्यांनीं कालमानातें पाहूनी केली गीतेची मांडणी जगदोद्धार करावया ॥१॥ कोणीं लाविली अद्वैतपर कोणीं लाविली द्वैतपर कोणीं लाविली कर्मपर त्याच एका गीतेला ॥२॥ हीच मोठी कामगिरी त्यांच्या हस्तें झाली खरी या कामाची नये सरी कोणत्याही कृत्यातें ॥३॥ येणेंच बाळ गंगाधर जगतीं होतील अजरामर कीर्ति त्यांची दूरवर पसरवील ग्रंथ हा ॥४॥ स्वातंत्र्य जरी मिळविलें असतें तरी ऐशी कीर्ति टिकते पहा करुन चित्तातें पूर्णपणें विचार ॥५॥ त्यांत फारसें नाहीं सार तो व्यवहार लौकिकीं ॥६॥ गीताशास्त्राचें तसें नाहीं तें मोक्षपदा प्रती देई आणि समाजाची बसवी पाही विस्कळीत घडी हें ॥७॥ यावच्चंद्रदिवाकर पुरुष बाळ गंगाधर चिरंजीव निरंतर राहील कीर्तिरुपानें ॥८॥ असो करवीर कोल्हापुरीचा द्विज चित्पावन जातीचा श्रीधर गोविंद नांवाचा काळे उपनांव जयाचें ॥९॥ तो गरिबीच्या स्थितींत गेला इंग्रजी शाळेंत आंग्लविद्या शिकण्याप्रत मँट्रिक परीक्षा पास झाला ॥११०॥ पुढें काँलेजांत गेला परी इन्टर नापास झाला म्हणून फिरत राहिला वर्तमानपत्रें वाचीत ॥११॥ तों केसरी पत्रांत वाचलें ओयामा टोगो चरित्र तेणें त्याच्या मनांत वृत्ति एक उठली अशी ॥१२॥ आपण जावें विलायतेला यंत्रविद्या ही शिकण्याला उगे भार भूमीला होण्यामाजीं अर्थ काय ? ॥१३॥ टोगो यामा दोघेजण प्रथमतः ज्ञान संपादून अभ्युदयाकारण जपान आणीते जहाले ॥१४॥ तैसें आपण करावें मायभूमीस उद्धरावें ऐसा विचार त्याच्या जीवें घेतला परी इलाज ना ॥१५॥ द्रव्याची लागे संगत कोणीही ना करी मदत घरची गरीबी अत्यंत काय करितो बिचारा ॥१६॥ तो आपल्या मित्रासी आला भेटण्या भंडार्यासी जो मन्रो हायस्कुलासी होता एक शिक्षक ॥१७॥ त्यासी विचार आपुला श्रीधरानें कळविला तोही त्याला पसंत पडला परी पैशाची वाट काय ? ॥१८॥ मित्रा, एक पैशाविणें कांहीं नाहीं जगीं होणें दरिद्रयानें मनींच करणें मनोराज्य बापा रे ॥१९॥ चाल जाऊं गांवाला आपुल्या जन्मभूमीला त्या करवीर कोल्हापुराला इकडे उन्हाळा विशेष ॥१२०॥ दोघे बसले गाडींत समर्थांची ऐकून कीर्त उतरते झाले शेगांवांत साधु कैसा तो पहावया ॥२१॥ पोस्टमास्तराच्या दारीं सामान ठेविलें सत्वरीं आतुरता मोठी अंतरीं समर्थाला पहाण्याची ॥२२॥ दोघे आले मठांत समर्थां केलें दंडवत बसते झाले जोडून हात स्वामीचिया सन्मुख ॥२३॥ मनोदय श्रीधराचा समर्थांनीं जाणिला साचा म्हणाले उगीच परदेशाचा विचार वेडया करुं नको ॥२४॥ अवघेंच कांहीं आहे येथ अर्थ ना भौतिक शास्त्रांत सेवी अध्यात्मविद्येप्रत म्हणजे कृतार्थ होशील तूं ॥२५॥ त्यायोगें विचारक्रांति श्रीधराच्या झाली चित्तीं कोल्हापूरची एक व्यक्ती आठवली या समयास त्या ॥२६॥ ते स्वामी कुंभारगल्लीचे होते कोल्हापुरीचे बोलणें याच परीचें होतें हमेशा भक्तांसी ॥२७॥ तैसेच हेही गुरुमूर्ती भक्तांसवें भाषण करिती याचा उलगडा चित्तीं कांहींच माझ्या होईना ॥२८॥ ऐसें श्रीधर आणितां मनीं महाराज वदले गर्जोनी हिंदुस्थाना सोडूनी उगाच कोठें जाऊं नको ॥२९॥ अगणित करावें पुण्य तेव्हांच होतें येथें जनन या भौतिक शास्त्राहून योगशास्त्र समर्थ असें ॥१३०॥ तें योगशास्त्र येतें ज्याला तो मानी या भौतिकाला योगशास्त्राहून भला अध्यात्मविचार श्रेष्ठ असे ॥३१॥ तो जमल्यास करुन पाही कोठें आतां जाई येई ऐसें समर्थ बोलतां पाही श्रीधर चित्तीं आनंदला ॥३२॥ पश्चिमेचा मावळला तोंच पूर्वेकडे आला विचार-सूर्य त्याचा भला श्रीधरा सुखी करण्यास ॥३३॥ एक संतावांचून विचाराचें परिवर्तन कोणी करुं शके आन सत्य एक त्यांनाच कळे ॥३४॥ महाराज म्हणाले या ठायीं तुझा अभ्युदय होईल पाही कांता वाट पहाते गेहीं तुझी कोल्हापुराला ॥३५॥ जा आतां मित्रांसहित आपुल्या कोल्हापुराप्रत तेंच पुढें झालें सत्य श्रीधर लौकिका चढले हो ॥३६॥ श्रीधर बी..एम्‌.. झाले प्रिन्सिपाँल त्या नेमिलें शिवपुरीं काँलेजाशीं भले सिंद्याचिया राज्यांत ॥३७॥ संत साक्षात्ईश्वर चालते बोलते भूमीवर त्यांच्या कृपेचा आधार जया मिळे तोच मोठा ॥३८॥ पहा काळे श्रीधराला दर्शनाचा योग आला म्हणून वृत्तींत फरक पडला खरें तेंच शोधावया ॥३९॥ हें पीक संतांचें याच देशीं यावयाचें वृक्ष नंदनवनीचें अन्य ठायीं येती हो ॥१४०॥ स्वस्ति श्रीदासगणूविरचित हा गजाननविजय नामें ग्रंथ दावो सर्वदा सत्पथ परम भाविकांकारणें ॥१४१॥ शुभं भवतु श्रीहरिहरार्पणमस्तु इति पंचदशोऽध्यायः समाप्तः



No comments:

Post a Comment